नगराध्यक्षा कावरे यांनी शहराला परिवारासारखे जपावे – खासदार नीलेश लंके यांचे आवाहन
पदग्रहण समारंभ उत्साहात
पारनेर, प्रतिनिधी
नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे यांनी पारनेर शहराला परिवारासारखे जपावे असे आवाहन खा.नीलेश लंके यांनी केले.पारनेर शहर हे तुमचा परिवार आहे. दररोज नगरपंचायतमध्ये या, लोकांच्या समस्या ऐका. चेहऱ्यावरील भाव पाहून नागरीकांच्या अडचणी ओळखा. शहरात फिरा, तक्रारी ऐका. कामामुळे पदाची प्रतिष्ठा वाढते. राजकारणात डोक्यात हवा जाऊ देऊ नका. पद जनतेसाठी असते, स्वतःसाठी नाही, असे खा.लंके म्हणाले.
महाविकास आघाडीच्या डॉ. विद्या कावरे यांनी पारनेरच्या नगराध्यक्षपदी १७ पैकी ११ मते मिळवत विजय संपादन केला. बुधवारी नगरपंचायत कार्यालयात पदग्रहण समारंभात त्यांचा कार्यभार मोठ्या उत्साहात पार पडला. खा. नीलेश लंके हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. विद्या कावरे या ज्या प्रभागाचे नेतृत्व करतात त्याच प्रभागात थोर क्रांतीकारक सेनापती बापट यांचे स्मारक आहे. योगायोगाने त्यांच्या जयंतीदिनी डॉ. कावरे या पदभार स्विकारला .
यावेळी बाजार समितीचे उपसभापती किसनराव सुपेकर, कान्हूरच्या सरपंच संध्या ठुबे, किशोर यादव, दादा शिंदे, चंद्रभान ठुबे, संदीप रोहोकले, दादा दळवी, अरूण पवार, डॉ. आबासाहेब खोडदे, चंद्रकांत कावरे, धोंडीभाऊ ठाणगे, वैभव गायकवाड, ॲड. पी.आर.कावरे, अमीत जाधव, बाळासाहेब नगरे, डॉ. सचिन औटी, सुभाष शिंदे, राजू शेख, ॠषीकेश गंधाडे, विजय भास्कर औटी, कारभारी पोटघन, बाजीराव कारखिले, सतीश भालेकर, सचिन गवारे यांच्यासह उपनगराध्यक्षा जायदा शेख, सुरेखा भालेकर, नितीन अडसूळ, अर्जुन भालेकर, योगेश मते, भूषण शेलार, सुप्रिया शिंदे, प्रियंका औटी, हिमानी नगरे, विद्या गंधाडे, नीता औटी यांच्यासह पारनेर शहरातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खा.लंके म्हणाले की,नगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान घोडेबाजार करण्याचा प्रयत्न झाला. महायुतीकडून नगरसेवकांना अमिष दाखवली, फोन गेले, आर्थिक दबाव टाकला गेला. मात्र आमचे नगरसेवक विकले गेले नाहीत. त्यांनी निष्ठा पाळली. त्यामुळेच आज डॉ. विद्या कावरे नगराध्यक्षपदी बसल्या आहेत. फटाके विरोधकांनी आणले, हेलीपॅड तयार केले, पण विजय मात्र निष्ठावंतांच झाला, असा टोला त्यांनी लगावला.
खा. लंके म्हणाले, राज्यातील हे सरकार सत्ता मिळवून बसले आहे. पण त्यांना वाटते की, त्यांनी खूप काही कमावले आहे. खरे सरकार असते तर राज्यभर आनंद दिसला असता. मात्र हे सुतक पडल्यासारखे बसले आहेत. लोकांच्या मनावर राज्य करणे हीच खरी सत्ता असते. पैशाने किंवा पदाने नाही, तर जनतेच्या प्रेमाने लोकनेतृत्व मिळते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जून भालेकर म्हणाले की, पारनेरच्या पाणी योजनेची फाईल अंतिम टप्प्यात आहे. ही योजना मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित आहे. खासदार नीलेश लंके यांनी त्यासाठी ९९ टक्के पाठपुरावा केला आहे. प्रवरेच्या आदेशामुळे ही योजना मंजुर होण्यासाठी अडथळे येत आहेत. पण खासदार नीलेश लंके हेच ही योजना पूर्णत्वास नेणार आहेत असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पारनेर शहराची ७४ कोटी रूपये खर्चाची योजना का अडविली याचा जाब सरकारला विचारण्याच हिंमत तुमच्यात आहे का ? असा सवाल करून योगेश मते म्हणाले, १२ जून २०२३ रोजी नगरपंचायतने तांत्रीक मंजुरीसाठी ७३ लाख रूपये शासनाकडे जमा केले आहेत. तरीही ही योजना का अडविण्यात आली ? यांना काहीच करायचं शिल्लक राहीलं नाही. कारण नीलेश लंके व आम्ही सर्व नगरसेवक यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता केलेली असून केवळ श्रेयवादासाठी ही योजना अडविण्यात आल्याचा आरोप मते यांनी केला.
चौकट
खासदार नीलेश लंके यांनी थेट सभेतून स्फोटक आरोप करत सांगितले की, तालुक्यात किमान ५० हजार मतांची हेराफेरी झाली आहे. त्याचे ठोस पुरावे माझ्याकडे असून ते लवकरच जनतेसमोर सादर करणार आहे. त्यांनी विरोधकांना टोला लगावत स्पष्ट केले की, विधानसभेच्या निकालाने आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांनी फार हुरळून जाऊ नये. याद्यांतील फेरफार, ईव्हीएम घोटाळयांच्या माध्यमातून काहींचा विजय झाला असला तरी सत्य किती दिवस दडवणार ? जनतेसमोर हे सर्व उघडकीस येणारच आहे.

